राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात आढळले सर्वाधिक कोरोनाबाधित


नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असतानाच दूसरीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे केंद्र तसेच राज्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे प्रमाण महाराष्ट्रात असून देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर तसेच देशातील दिल्ली आणि बंगळुरू अर्बन या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. देशात मागील 24 तासात 56 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 271 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.

देशात मागील आठवड्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 5.65 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 23 टक्के, पंजाबमध्ये 8.82 टक्के, छत्तीसगडमध्ये 8 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 7.82 टक्के, तामिळनाडुत 2.04 टक्के, कर्नाटकमध्ये 2.45 टक्के, गुजरातमध्ये 2.2 टक्के तर दिल्लीत 2.04 टक्के एवढी रुग्णवाढीची टक्केवारी होती.

आतापर्यंत देशात 1 लाख 62 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात त्यापैकी 54 हजार 283, तमिळनाडूमध्ये 12 हजार 684, कर्नाटकात 12 हजार 520, दिल्लीत 11 हजार 12, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 325, उत्तर प्रदेशात 8 हजार 790, आंध्र प्रदेशमध्ये 7 हजार 210 आणि पंजाबमध्ये 6 हजार 749 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनासोबत नागरिकांनी कोरोना पसरण्याचा वेग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणावेळी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या बाबी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी आपला नंबर येईपर्यंत या सवयींमुळे आपण कोरोनाला रोखू शकतो.