परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न


मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. दरम्यान बुधवारी तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालायने घेतला आहे.

उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर प्रश्न उपस्थित केला. ही सुनावणी मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्यासमोर पार पडली. उच्च न्यायालयाने यावेळी मागण्यांवर बोट ठेवत याचिका जनहित याचिका कशी? असा प्रश्न केला. न्यायालयाच्या प्रश्नानंतर परमबीर यांच्या वकिलाने जनहित याचिका कशी ? हे उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान पटवून देण्याचा म्हटले. दरम्यान याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

देशमुख पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी पैशांची मागणी करतात, ते तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी याचिकेत केले आहेत. त्यांनी त्यासाठी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य तसेच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. तसेच सीबीआयमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणे गरजेचे असून, तसे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी केली आहे.

तपासकार्यात देशमुख हे वारंवार हस्तक्षेप करतात, भाजपच्या नेत्यांना दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गोवण्यासाठी त्यांनी दबाव आणल्याचा आरोपही परमबीर यांनी केला. देशमुख यांच्याकडून होत असलेल्या खंडणीच्या मागणीबाबत आणि पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली होती. पण आपल्याला त्यानंतर लगेचच १७ मार्चला मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून गृहरक्षक दलात बदली करण्यात आली. आयुक्तपदी दोन वर्षे पूर्ण करण्याआधीच ही बदली करण्यात आल्यामुळे हा निर्णय मनमानी आणि बेकायदा असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

देशमुख यांनी आपल्या बदलीनंतर एका मुलाखतीत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी तपासात आपल्याकडून चुका राहिल्याची टिप्पणी केली होती. परंतु, या प्रकरणाच्या तपासासाठी आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले गेल्यामुळे आपली बदली मनमानी, बेकायदा आल्याचा दावा परमबीर यांनी केला.