राज्यातील लॉकडाऊनवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा भाष्य


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत असल्यामुळे सध्या राज्यातील जनतेला एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार का? याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले की, सध्या कुणालाच लॉकडाऊन नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. ऐनवेळी लॉकडाऊन लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याबद्दल चिंता आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की रुग्णांना उपचार मिळत नसल्यामुळे बेडची संख्या ही रुग्ण संख्यापेक्षा कमी असते, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करावे लागते. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची संख्या याबाबत जर तक्रारी येऊ लागल्या तर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. याबाबत अभ्यास सुरू आहे. पण लॉकडाऊन नको असे काहीजण म्हणतात, पण सगळा विचार करून मध्यबिंदू गाठून निर्णय घ्यावा लागेल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असल्यामुळे बेड्स काही शहरात उपलब्ध नाहीत हे मान्य आहे. या क्षणाला रुग्णालयात बेड मिळतच नाही असे काही नाही. कालच्या बैठकीत खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्यामुळे बेड कमी पडणार नाही. तसेच 80 टक्के ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्याचे राजेश टोपे म्हणाले.