काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस नाही


मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर वाढली आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार यांची तब्येत खराब असून त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केल्यानंतर देशभरातील विविध नेत्यांनी विषेशतः केंद्र सरकारमधील पंतप्रधानापासून अनेक मंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांनी देखील त्यांचे आभार मानले. पण विचारपूस करणाऱ्याच्या ट्विटमध्ये दिल्लीतील राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचा उल्लेख नाही. त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांची शरद पवारांशी जवळीक वाढू लागली आहे, तर काँग्रेसचे नेते पवारांपासून अंतर ठेवून लांब राहत असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त करत टीका देखील केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधांवर संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही परिणाम झाल्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस नेते व राज्यातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत संजय राऊत संपादक आणि खासदार यात गफलत करत आहेत का? असा प्रश्न विचारला आणि याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, असे सूतोवाच केले.

एकीकडे हे सर्व सुरु असताना शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचे वृत्त आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले. अशी भेट झाली नसल्याचे राष्ट्रवादीने वारंवार स्पष्ट केले असले तरी दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठी याकडे कसे पाहतात त्यांची भूमिका अजून समोर आलेली नाही. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी फोन केलेले नाही. पण काँग्रेसकडून राज्यातील नेते वगळता दिल्लीतील एकही नेत्यांकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे दिसत नाही.

शरद पवारांच्या प्रकृतीची भाजपकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या दिल्लीतील नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या राज्यातील नेत्यांनी फोन करून विचारपूस केली. स्वतः शरद पवार यांनीच ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत.

पण काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, भालचंद्र मुणगेकर या राज्यातील नेत्यांकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे. तसे ट्विट देखील त्यांनी केले आहे. पण दिल्लीतील एकाही नेत्याने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मात्र पवारांना याबाबत फोन केला नाही. ज्यांचे प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन आले, त्यांचे ट्विट करून शरद पवारांनी आभार मानले आहेत. या ट्विटवरूनच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांचा पवारांना फोन आला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, राज ठाकरे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूपासून देशातील अनेक नेत्यांनी ट्विट करून शरद पवार यांना लवकर बरे व्हावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यूपीएचे अध्यक्षपद आणि अमित शहा-शरद पवार कथित भेट यामुळे काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीविषयी नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच पवारांची विचारपूस करणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी टाळले का असा प्रश्न उपस्थित होत आहे.