प्रकाश आंबेडकरांनी केली खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीच्या रॅकेटच्या चौकशीची मागणी


पुणे : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीचे रॅकेट सुरू झाले असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. खाजगी लॅबमधील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर सरकारी रुग्णालयातील चाचणी निगेटिव्ह आल्याचा प्रकार अमरावतीत समोर आल्यामुळे कोणत्या लॅबचा रिपोर्ट खरा हा प्रश्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात म्हटले आहे.

याप्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार 80 % लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. ते लोक घरात राहू शकतात. लॉकडाऊन असतांना सुद्धा रुग्ण संख्या वाढली. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध असल्याचे आहे.

जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. जम्बो कोविड सेंटर आता कॉन्ट्रॅक्टवर दिली आहेत. तेथील परिस्थिती अजिबात चांगली नाही. खासगी डॉक्टरांची तिथे नियुक्ती केली जात आहे. सरकारने स्वतः जम्बो कोविड सेंटर चालवावे, असे देखील ते म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार एखाद्या अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगतात, ही परिस्थिती आहे. गृहमंत्री यांना कुणी सांगितले, पार्टीने सांगितले का? हा विषय कॅबिनेटमध्ये झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे. ते म्हणाले की, मागील पाच वर्षातही उद्धव ठाकरे हे सत्तेत होते, उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. उद्धव ठाकरे यांना कणा नाही. हे सरकार बरखास्त करावे, हे सरकार क्रिमिनल आहे. नवीन सरकार यावे, असे माझं मत असल्याचे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, आदेशांची पायमल्ली पंतप्रधान मोदींच करत आहेत. तिथे एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही. माझे आवाहन आहे, त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी. बंगालच्या लोकांना डिवचले तर चालत नाही. मोदी वारंवार तिथे जाऊन त्यांना डिवचत आहेत. ज्या ज्या वेळी तिथे जाऊन प्रचार करतील, तेव्हा ममता यांच्या पाच सीट वाढत जातील, असे ते म्हणाले.