देशासह महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?


नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सलग तिसऱ्या दिवशी देशात 62 हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. काल दिवसभरात 68 ,020 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 291 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 32,231 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात शनिवारी 62,716 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली होती. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली असल्यामुळे देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही एक कोटी 20 लाख 39 हजार 644 एवढी झाली आहे तर आतापर्यंत एक कोटी 13 लाख 55 हजार 993 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या एकूण पाच लाख 21 हजार 808 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एक लाख 61 हजार 843 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत सहा कोटीच्या वर लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

देशात सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आज राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. आज राज्यात तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

राज्यात 17 हजार 874 कोरोनाबाधित रुग्ण आज बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 325901 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. आज दिवसभरात कोरोनाने 108 रुग्णांचा बळी घेतला आहे.