जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा – अतुल भातखळकर


मुंबई – कोरोनाचा राज्यात दुसऱ्यांदा उद्रेक झाल्याने होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. सरकारने सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर निर्बंध घातले असून, भाजपने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर टीका करताना शिवसेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी साजरी करा, असं आवाहन केल्यामुळे होळी आणि धूलिवंदनाच्या सणावरून पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आली आहे.

कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होळीच्या आधीच झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने होळी व धूलिवंदनासाठी नियमावली जारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेने शहरांत सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये, यासाठी पोलिसांनीही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे.


भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमावलीवरून टीका केली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.


हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणत आहे, होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल, पण नियमांचे पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीने परवानगी दिली जाते ते काय कोरोनाचे नातेवाईक लागतात का वसुली सरकारचे?, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.