नियोजित वेळापत्रकानुसारच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा – वर्षा गायकवाड


मुंबई – 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षा आणि 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान इयत्ता बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी कोरोनामुळे आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. आताच्या परीक्षेला विद्यार्थी आले नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.