महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा करण्याचे प्रकाश जावडेकरांचे आश्वासन


मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाने गंभीर रुप धारण केले असून काल दिवसभरात राज्यात तब्बल 35 हजार 952 कोरोनाबाधितांची वाढ झाली. तर 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. आता याच संदर्भात महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.

ट्विटरद्वारे ही माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विके पॉल यांच्याशी चर्चा केली, महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार/प्रत्यक्षातील लसीकरणानुसार कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी आता लसीकरण सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट करावे, असे ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

याआधी प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारकडे लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्र शासनाने राज्यात पाठविल्या गेलेल्या एकूण 54 लाख लसींपैकी फक्त 23 लाख लस 12 मार्चपर्यंत वापरल्या आहेत. 56 टक्के लस वापराविना पडून आहेत. आता, शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लस देण्याची मागणी करत आहे. पहिल्यांदा साथीचा आजार रोखण्यात अपयश आता लसीकरणातही ढिसाळ कारभार, अशी टीका जावडेकर यांनी केली होती.

कोरोनाबाधितांची शहरातील संख्या पाहता सध्या 50 टक्के खाजगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेतले आहे. परिस्थिती गंभीर असून नाईलाजास्ताव आता कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्राची संख्या 300 वरून 600 वर करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. मदतीचे आश्वासन प्रकाश जावडेकरांनी दिले असल्याचे अजित पवार म्हणाले.