लॉकडाऊनबाबत अजित पवारांचा पुणे-पिंपरी चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!


पुणे – पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. त्याचबरोबर पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. हा आकडा काही दिवशी मुंबईपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आल्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी आज झालेल्या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय २ एप्रिलसंदर्भात घेण्यात आला. लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झाला हे खरे असले तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. तो निर्णय २ एप्रिलपर्यंत घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

आजही काही भागात जनतेच्या मनात सुरुवातीला जी भिती होती, ती आता राहिलेली नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आजच संपर्क करून आम्ही त्यांना विचारले आहे की लसीकरणाची ३१६ केंद्र दोन्ही शहरांत आहेत, ती दुप्पट करू शकतो का? तसे केले तर लसीकरणाचा कार्यक्रम पुण्यात सर्वात जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करता येईल. त्यावर मदत करण्याचे आश्वासन प्रकाश जावडेकरांनी दिल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले. बेडची संख्या वाढवण्याचे काम, लसीकरणाचा वेग ३०० वरून ६०० केंद्रांपर्यंत नेण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी लसीचे डोस कमी पडतील की काय, ही बाब केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.

पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी काय आहेत नवे नियम?

  • खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात ८० टक्के बेड घेतले होते, आता ५० टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव
  • १ तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद
  • शाळा-महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
  • मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थिती.
  • सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.
  • लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या अजिबात नको. अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी
  • सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.