युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे – संजय राऊत


नवी दिल्ली – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे वृत्त असून सुप्रिया सुळे यांनी याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे वृत्त फेटाळले आहे. शरद पवारांच्या नावाला युपीएमध्ये कोणाचा विरोध असल्याची माहिती नसल्याचेही त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना अशा सूचना काँग्रेस पक्षातूनच येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची ही भूमिका आहे. तशी भूमिका सोनिया गांधीचीही असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचे नेतृत्व खंबीरपणे केले आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत, अशावेळी युपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. युपीए आज अत्यंत विकलांग अवस्थेत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपप्रणीत एनडीएसमोर देशात काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. पण, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती.

दरम्यान खरंच ते पत्र परमबीर सिंह यांनी लिहिले आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिले आणि त्यांनी सही केली, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असे सांगत आहेत असे त्यांनी म्हटले. कोणाचाही चौकशीला नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या, अशी टीका त्यांनी केली.

त्यांच्या राजवटीत चौकशीआधी किती लोकांना फाशी दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असे वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसते याचे भान प्रत्येक विरोधी पक्षनेत्याने ठेवले पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधी पक्षाचे वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे हसू होत आहे, त्यांना लोक मूर्खात काढतात हे समजले पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असे वाटत नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

तर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून झाला. त्याबद्दल काय झाले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? जी नावे पाठवली आहेत, ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.