महाराष्ट्रावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होणार; आगामी आठवड्यात दिवसाला १००० जणांचा मृत्यू होण्याची शक्यता


मुंबई – पुढील दोन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रामधील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढणार असल्याची भीती राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चार एप्रिलपर्यंत तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये ४७ हजार ७०७, पुण्यामध्ये ६१ हजार १२५, तर मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील, असेही सांगितले जात आहे. आरोग्य सेवांची संख्या नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची आकडेवारी ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आठवड्याला कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण एका टक्क्याने वाढत असल्याचे सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज याच आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला आहे. संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ एवढी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याचा अर्थ असा की पुढील दोन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात कोरोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवारी महाराष्ट्रामध्ये ३१ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यामध्ये सध्या २५ लाख ६४ हजार ८८१ एवढी आहे. त्यापैकी दोन लाख ४७ हजार २९९ हे उपचार सुरु असणारे रुग्ण आहेत. राज्यामध्ये सध्या मृतांची संख्या ५३ हजार ६८४ एवढी आहे. राज्यामध्ये बुधवारी ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या राज्यामध्ये पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील पुढील काही दिवसांमध्ये बेडची संख्या वाढवली नाही, तर परिस्थिती गंभीर निर्माण होईल, अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

सध्या ज्या वेगाने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच्या आधारे राज्यातील आरोग्य विभागाने ही भविष्यातील आकडेवारीसंदर्भातील शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची मागील तीन ते चार दिवसांमध्ये संख्या एक लाखांनी वाढली आहे. सध्या एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यापैकी ८ टक्के गंभीर तर ०.७१ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोना बेड्सची संख्या रुग्णांची संख्या पाहून त्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित करण्यात यावी, असे मत व्यास यांनी व्यक्त केले आहे. कोरोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, असे मत व्यास यांनी व्यक्त केले आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचे प्रमाण तपासून पाहणे यासारख्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत, असे मतही व्यास यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी तीन हजार अतिरिक्त बेड्सची सोय पुढील चार दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे ठाण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये अडीचशे बेड्स वाढवले जाणार असल्याची माहिती नागपुरचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली. तसेच सरकारी आरोग्य महाविद्यालयामध्ये ९० तर सरकारी रुग्णालयामध्ये ४५ बेड्स वाढवण्यात येणार असल्याचे राधाकृष्ण बी यांनी म्हटले आहे.