राष्ट्रपतींची भेट घेत रामदास आठवलेंनी केली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी


नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली असून यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. एएनआयशी बोलताना रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींनी आपल्या मागणीवर विचार करु असे उत्तर दिल्याचे सांगितले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये १०० कोटींच्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे.

महाराष्ट्रामधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलो असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी विचार करु असे सांगितल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडत असून खूप गंभीर घटना समोर येत आहेत. एक पोलीस अधिकारी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचे काम करतो. गृहमंत्री सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी मिळाले पाहिजेत, असे सांगतात. पहिल्यांदाच असे होत असल्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याची माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.