मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी पोलिसांना महत्वाचा आदेश


मुंबई – राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही दिली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने यावेळी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले. अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका न्यायालयाने दाखल करुन घेतली. आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून रद्द करण्यात आला.

गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश दिला. प्रकरणाचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार हे बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्याचे न्यायालयाने पोलिसांना बजावले होते. १२ आठवड्यात तपास पूर्ण केल जाईल अशी माहिती देण्यात राज्य सरकारकडून आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.