माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंनी पवारांच्या ‘त्या’ मागणीला दिले उत्तर


मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका उपस्थित केली असून उचलबांगडी करण्यात आल्यानंतरच का आरोप केले? अशी विचारणा केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते, असे शऱद पवार यांनी सुचवले होते. त्यावर आता ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांवर परमबीर यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासातील गोपनीय माहिती उघड होणे हा मुंबई पोलिसांचा गलथानपणा ठरतो. मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेलाही या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे धक्का बसत आहे. ही चौकशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून केली जाऊ शकते, असे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.

दरम्यान एनडीटीव्हीशी बोलताना ज्युलिओ रिबेरो यांनी आपल्याला ऑफर देण्यात आली तरी हे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी अशा गोंधळलेल्या परिस्थितीला स्पर्श करु इच्छित नाही. ही अत्यंत अवघड परिस्थिती असून या सगळ्याचा शेवट कुठे घेऊन जाईल, हे मला माहिती नसल्यामुळे यावर राजकारण्यांनीच तोडगा काढून परिस्थिती पूर्ववत करणे योग्य असल्याचे ते म्हणाले आहेत.

दुसरीकडे पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन हे थांबवावे सांगण्याची गरज होती, जर गृहमंत्र्यांनी नकार दिला असता तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. एक प्रामाणिक आणि सरळमार्गाने चालणाऱ्या अधिकाऱ्याने हेच केले असते, असेही ज्युलिओ रिबेरो यांनी सांगितले.

माझे वय ९२ वर्ष असून, मी अशा चौकशांसाठी समर्थ नाही. मात्र, समर्थ असतो तरी चौकशीस मी नकार दिला असता, असेही रिबेरो म्हणाले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांची नावे जर खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

त्यांना सचिन वाझे यांच्यावरील आरोपांबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, थेट पोलीस आयुक्तांना सचिन वाझे रिपोर्ट करत होते. मला वाटते त्यांनीदेखील आरोपांमधील वाटा घ्यायला हवा. कोणाचाही आशीर्वाद नसताना सचिन वाझे एवढे सगळे कसे काय करु शकतात? ते फक्त एसीपी आहेत, जी खूपच छोटी रँक आहे. ९२ वर्षीय ज्युलिओ रिबेरो १९८२ ते १९८६ दरम्यान मुंबई पोलीस प्रमुख होते. यानंतर ते गुजरात आणि पंजाबमध्ये आयुक्तपदी होते. आपल्या कार्यकाळात अशी कोणतीही गोष्ट घडली नसल्याचे ते म्हणाले आहेत.