राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा पुन्हा उद्रेक; ओलांडला २५ हजारांचा टप्पा, ७० मृत्यूंची नोंद!


मुंबई – राज्यात मागील ३ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित सापडू लागल्यामुळे राज्यात अजून कठोर निर्बंध लागू होऊ शकतात अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्यात १७ मार्च रोजी २३ हजार १७९ कोरोनाबाधित सापडले होते. १८ मार्चला ही संख्या वाढून २५ हजार एवढी झाली. पण आज शुक्रवारी १९ मार्च रोजी राज्यात दिवसभरात २५ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित सापडल्यामुळे राज्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० एवढा झाला आहे. राज्यात मागील ३ दिवसांत तब्बल ७४ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. पण, त्याचबरोबर आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असतानाच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. राज्यात १५ मार्च रोजी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हाच आकडा १६ मार्च रोजी वाढून थेट ८७ वर गेला. १७ मार्च रोजी पुन्हा ८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला. हा आकडा १८ मार्च रोजी कमी होऊन ५८ पर्यंत खाली आला होता. पण आज पुन्हा तो वाढून ७० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्यामुळे राज्यातील मृत्यूदर वाढून २.२० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

राज्यात नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक ३ हजार ६३ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. तर ७० मृतांपैकी मुंबईतील १० रुग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात १ हजार ३२६ नव्या रुग्णांची भर पडली असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात २ हजार ८३४ रुग्णांची नव्याने भर पडली असून मुंबईपेक्षा जास्त म्हणजे १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी नंदुरबारमध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हा एक पर्याय असल्याचे वक्तव्य केले आहे. नियम पाळले नाहीत, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच, राज्य सरकारने नवी नियमावली देखील जारी केली आहे. त्यामुळे राज्यातील वाढते कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा वाढणारा आकडा सरकार आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरू लागला आहे.