तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून राज्यातील कोरोना वाढत आहे का?


मुंबई : देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे कडक निर्बंध लावले जात आहेत, त्याला मनसेकडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातीलच कोरोना कसा वाढत आहे ? असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचाराला आहे.

कोरोनाचा राज्य सरकारकडून बाऊ केला जात आहे, लोकांना कोरोनाच्या नावाखाली भीती दाखवली जाते असल्याचा आरोप मनसेकडून सातत्याने केला जात आहे. मास्क वापरायच्या भूमिकेच्या विरोधात स्वत: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. आपल्या कृतीतून ते त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून राज्यातील कोरोना वाढत आहे का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढत आहे? सरकारचे कोरोनावर का कोरोनाचे सरकारवर प्रेम आहे ? असे सवाल मनसेने राज्य सरकारला विचारले आहेत. सरकार जर एवढे जर कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का? असाही सवाल मनसेने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी बोचरी टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचे का? असाही सवाल मनसेकडून केला गेला आहे. त्याचबरोबर वीज बिलाचे पैसे लोक कसे भरणार असा प्रश्न विचारत मनसेने लॉकडाऊन लावायचा तर मग वीज तोडणी बंद करा, अशीही मागणी केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हे प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर आले, तेव्हा मुंबई नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. सरकाराला प्रश्न विचारला की त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार. पोलिसांची प्रतिमा राज्यासाठी महत्वाची आहे, त्यांनी त्यासाठी काम केले आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पूर्ण सत्य बाहेर येऊ द्यात.