राज्यात आज १५ हजार ५१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर ४८ रूग्णांचा मृत्यू


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर दररोज मोठ्याप्रमाणावर कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. तर, यामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.

राज्य सरकार या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. तसा इशारा देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. दरम्यान, आज(सोमवार) दिवसभरात राज्यात १५ हजार ५१ कोरोनाबाधित वाढले असून, ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज रोजी राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज १०,६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, आजपर्यंत राज्यात एकूण २१,४४,७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

कोरोनाचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातील जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच तशा प्रकारचे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.