राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध अजून कठोर करणार – राजेश टोपे


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आता त्यापाठोपाठ राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला केल्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच तशा प्रकारचे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी हॉटेल, उपहारगृहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना नियम पाळा, कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा दिला होता. राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. देशात सर्वाधिक ८६ टक्के नवे कोरोनाबाधित ७ राज्यांमध्ये सापडत असून त्यामध्ये सर्वाधित सरासरी ५० टक्के बाधित एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. या पार्श्वभूीवर सरकारी पातळीवर खलबते सुरू असून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्री याबाबत बोलताना म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढला असून प्रादुर्भावाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. पण जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला असल्याचेही राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे”, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा नसल्याचे यावेळी राजेश टोपेंनी स्पष्ट केले. राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.