उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य; भविष्यात लोक देवी-देवतांप्रमाणे मोदींचीही पूजा करतील


डेहरादून – पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्यांशी केली आहे. हरिद्वारमध्ये रविवारी नेत्र कुंभाची सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींचे तोंड भरुन कौतुक केले आणि याचवेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली असल्याचे सांगितले.

आज मोदींना भेटण्यासाठी अनेक मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष रांगेत उभे असल्याचेही रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्रेता आणि द्वापर युगामध्ये ज्या पद्धतीने भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता, त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मुख्यमंत्री रावत हे मोदींवर स्तुतीसुमने उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे, तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारत देखील नव्हते. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, असे रावत म्हणाले. सध्या रावत हे पौडी लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत. जनतेचे काम करणारे लोकप्रितिनिधी म्हणून मोदींनी जनतेवर कधीही न पुसता येणारी छाप सोडल्याचे प्रशस्तीपत्रकही रावत यांनी मोदींना दिला. मोदींच्या कामाकडे पाहूनच मोदी है तो मुमकिन है, असे म्हटले जाते, असेही रावत म्हणाले.

द्वापर युगामध्ये ज्याप्रमाणे भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केले, त्याच प्रकारे येण्याऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल, असेही आपल्या भाषणात रावत म्हणाले.

तीरथ सिंह रावत यांनी मागील आठवड्यामध्येच उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सोमवारी (आठ मार्च रोजी) त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले होते. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. रावत यांच्याबद्दल भाजप आमदारांनी पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. याच पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सींह रावत यांची वर्णी लागली.