अन्वय नाईक कुटुंबियांचा अंबानी प्रकरणावरुन गदारोळ घालणाऱ्या विरोधकांना सवाल


मुंबई – मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ घातल्यानंतर अन्वय नाईक प्रकऱणाचा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आल्यामुळे अन्वय नाईक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून अन्वय नाईक प्रकरण फडणवीसांनी दाबले असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. फडणवीसांनी यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक कुटुंबियांनी या सर्व घडामोडींदरम्यान पत्रकार परिषद घेत या प्रकरणी विरोधी पक्षाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? अशी विचारणा केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही, तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु असल्याचे सांगत त्यांनी यावेळी फडणवीसांवर निशाणा साधला, तसेच मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळे फासले असे म्हणणे योग्य वाटते का? अशीदेखील विचारणा केली.

ज्या धमक्या आम्हाला येत आहेत त्याचे काहीच नाही का? अद्यापही आम्हाला धमक्या दिल्या जात असल्याचे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितले. जेलमधून अर्णब गोस्वामी बाहेर पडल्यानंतर तो सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नसल्याचे त्या म्हणाल्या. आमची प्रकरण दाबले गेले असून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमच्यावर हात टाकण्यात आला होता. मग त्यावेळी तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता, हे देखील बाहेर काढावे. मी आणि आई मनाचे काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आली आहेत. आमची चौकशी करण्याचा आदेश तपास अधिकाऱ्याला कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावे… आम्ही पण तयार आहोत चाय पे चर्चेला, होऊन जाऊ द्या, असे आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिले. तसेच याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होत आहे? असा सवाल विचारला.

यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचे अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी सांगितले. तसेच गरज लागल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.