नव्याने होणार नाहीत आरोग्य खात्याच्या भरती परीक्षा : राजेश टोपे


मुंबई – २८ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित महाभरती परीक्षेला एकूण ५४ संवर्गांतून १ लाख ३३ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात झालेल्या गोंधळामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. पण गैरप्रकाराच्या तक्रारी काही निवडक संवर्गांच्या तसेच तुरळक केंद्रांवरील असल्यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द होणार नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिले. कॉपीच्या तक्रारी आलेल्या आरोग्यसेवक आणि चालक या दोन संवर्गाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद येथील सायबर कॅफेचा कॉपीप्रकरणी तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

४ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी महापोर्टलद्वारे झालेल्या या परीक्षांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि ही परीक्षा ३२ जिल्ह्यातील ८२९ केंद्रांवर झाली होती, पण तुरळक केंद्रांवरील तक्रारी आल्याचे ते म्हणाले. इलेक्ट्रिक लॉकमधील प्रश्नपत्रिका, जीपीएसद्वारे त्याच्या वाहतुकीचे ट्रॅकिंग आदी काळजी घेतल्याने गैरप्रकारांना आळा बसल्याचे ते म्हणाले.

हे काम ब्लॅक लिस्टेड कंपनीस दिल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने या कंपनीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांचा हा खुलासा मंजूर न झाल्याने विरोधी पक्षाने या प्रश्नावर सभागृहात कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला.

इअरफोन घातलेल्या परीक्षार्थीला औरंगाबादच्या एका केंद्रावर पकडले होते. कोकणपुऱ्यातील सायबर कॅफेवर छापा घातला असता आरोग्यसेवक आणि ड्रायव्हर या संवर्गाच्या परीक्षांचे काही प्रश्न तेथे पोहोचल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हे शाखेतर्फे याचा तपास सुरू असल्याने वरील दोन्ही संवर्गांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुतार संवर्गासाठी एका सेंटरवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याने तेथील पुन्हा परीक्षा होतील.