कोण आहेत सचिन वाझे? ज्यांच्यामुळे निर्माण झाला एवढा वादंग


मुंबई : आज विधानभवनात मनसुख हिरेन प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात विधानसभेत चर्चा करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आयपीसी कलम 201 अंतर्गत सचिन वाझे यांना अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘सचिन वाझे यांना कोण वाचवत आहे?’ असा थेट सवाल विचारला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयीत कारचा सचिन वाझे तपास करत आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोपही सचिन वाझेंवर देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली आहे. या अगोदरही अनेकदा सचिन वाझे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत.

1990 च्या बॅचमधील सचिन वाझे हे पोलीस अधिकारी असून एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. 2004 साली सत्य लपवण्याच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. 2002 साली घाटकोपरमधील बॉम्ब विस्फोट प्रकरणात ख्वाजा युनूसला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादला युनूसला नेत असतानाच तो फरार झाला. पण सीआयडी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. युनूसचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असतानाच झाल्याचे स्पष्ट झाले. सचिन वाझे 2004 साली या प्रकरणात प्रमुख भूमिकेत असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. तांत्रिक बाबींचा सचिन वाझे यांचा अभ्यास चांगला होता. 2010 साली त्यांनी ‘लाल बिहारी’ नावाचे नेटवर्किंग सुरू केले. आपल्या करिअरची सुरूवात सचिन वाझे यांनी पुण्यातून केली होती. तसेच सचिन वाझे यांनी “शीना बोरा हत्या प्रकरण’ आणि ‘डेविड हेडली’ यावर पुस्तके लिहिली आहेत.