अर्थसंकल्प राज्याचा; राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा


मुंबई – राज्याच्या आरोग्य क्षेत्रामधील कोरोना काळात अनेक त्रुटी उघड झाल्यामुळे या क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी केल्या जातील, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची आणि घोषणांची माहिती दिली. त्यांनी यावेळी राज्यात ५ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, पुण्याच्या ससून रुग्णालयातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे.

राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल, असे अजित पवार म्हणाले. तसेच. यामुळे, पदवी स्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार असल्याचे देखील ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालये स्थापन करण्यासाठी सार्वजनिक-खासगी धोरण अवलंबले जाईल. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, बीजे मेडिकल महाविद्यालय पुणे यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयातल्या वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचा मुद्दा चर्चेला आला होता. या निवासस्थानांच्या बांधकामासाठी अर्थमंत्र्यांनी २८ कोटी २२ लाख अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली.

दरम्यान, शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली नागरी आरोग्य संचालक कार्यालयाची निर्मिती करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी येत्या ५ वर्षांत ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातले ८०० कोटी या वर्षी उपलब्ध करून देण्यात येतील, असं ते म्हणाले.

त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थांचे बांधकाम आणि उत्तम आरोग्य सुविधांसाठी ७ हजार ५०० कोटींचा प्रकल्प तयार केला असून ४ वर्षांत पूर्ण केला जाईल. यात आरोग्य सेवा केंद्र, रुग्णालयांचे बांधकाम आणि श्रेणीवर्धनाचा समावेश आहे.

संसर्गजन्य आजारांच्या उपचारांसाठीचे अद्यायावत रुग्णालय आवश्यक. तसे रुग्णालय औंधमध्ये स्थापन करून विभागीय पातळीवर रुग्णालयांची उपकेंद्र स्थापन केली जातील. ह्रदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओग्राफीसाठी ८ ठिकाणी कार्डिअॅक कॅथलॅब स्थापन केली जाईल. कर्करोगासंदर्भात १५० रुग्णालयांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील. आग प्रतिरोधक यंत्रणांची कमतरता असलेल्या रुग्णालयांमध्ये त्या बसवण्यात येतील.

रुग्णसेवांशी संबंधित परिचारिकांच्या अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल करून रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी ११ शासकीय परिचारिका विद्यालयांचे महाविद्यालयात रुपांतर केले जाणार आहे.

कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुस, यकृताचे आजार बळावत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कोविड पश्चात समुपदेशन व उपचार केंद्र स्थापन केले जाईल.