‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र


मुंबई: ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. राज्याला ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्प गमावणे परवडणारे नाही. राज्याचे अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज्यातील या तिन्ही प्रमुख नेत्यांना राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले असून त्यात कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्था कोलमडल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज यांनी या चारपानी पत्रात राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत सल्लेही दिले आहेत. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन राज यांनी केले आहे.