राज्यात दिवसभरात आज ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर ६० रुग्णांचा मृत्यू


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गंभीर रुप धारण करत आहे. कारण राज्याचील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडत असल्यामुळे सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढत आहे. आज (गुरूवार) दिवसभरात ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात झाल्यापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये अनेक नागरिक कोरोना संपल्याच्याच आविर्भावात वावरत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच काहीसे चित्र मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनासंदर्भातली बदलती आकडेवारी डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. एकीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित वाढू लागल्यामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले असताना राज्य सरकार मुंबईत देखील पुन्हा निर्बंध घालण्याच्या विचारात आहे. मागील २४ तासात मुंबईतील आकडेवारी पाहिल्यास राज्य सरकार पुन्हा निर्बंधांचा विचार का करत आहे, याची प्रचिती येऊ शकते.