इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आणीबाणी लावणे चूक होती आणि त्या काळात जे काही घडले ते देखील चुकीचे असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी हे वक्तव्य प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना केले आहे. आणीबाणी काँग्रेसकडून लागू करणे एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले. आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.


मला वाटते आणीबाणी एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण जे काही आणीबाणीच्या काळात झाले आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. कधीही घटनात्मक चौकट काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगी देखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नसल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

१९७५ ते १९७७ दरम्यान दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २१ महिने आणीबाणी लावली होती. याआधी २०१९ लोकसभा निवडणुकीत देखील राहुल गांधींनी एका मुलाखतीत आणीबाणी चुकीची होती सांगत माफी मागितली होती. तर २४ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील एका रॅलीत इंदिरा गांधी यांनी जाहीरपणे माफी मागितली होती.

देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्‍या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. त्या स्वातंत्र्यावरच भारतात हल्ला केला जात आहे. इतर सर्व संस्थांमध्ये आरएसएस नावाची एक मोठी संस्था प्रवेश करत आहे. हल्ला होत नाही अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्धतशीरपणे सुरु असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. एक विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या आणि एका ठराविक संस्थेच्या लोकांनी न्यायव्यवस्था, प्रेस, प्रशासकीय सेवा, निवडणूक आयोग प्रत्येक संस्थेत अत्यंत पद्दतशीरपणे भरली जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.