…अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राग विधानसभेत अनावर झाला


मुंबई – राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून केंद्रानेच हा दर्जा दिला नसल्याचा आरोप पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारमुळेच मिळाला नसल्याचे सांगितले. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे प्रश्न उद्धव यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले.

राज्यपालांचे आभार मानल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय केंद्राने अडकवून ठेवल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. पण अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभे ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना उद्धव यांनी संतापून, मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत? छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नसल्याचे म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचे समर्थन केले.

तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते पहिले हिंदुत्व राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींची ही मातृभाषा आहे. तिच माझी आणि तुमची मातृभाषा आहे. तसेच छत्रपती नसते तर तुमचे आमचे सोडून द्या. दिल्लीत जे बसले आहेत ते तरी असते का हा पहिला विचार केला पाहिजे आणि आपले अस्तित्व ज्या भाषेमुळे आहे, त्या भाषेला तुम्ही तिचा मान द्यायला नाकारात आहात हा करंटेपणा महाराष्ट्र कदापी विसरु शकत नाही. मराठी माती आणि मराठी माता हे विसरु शकत नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न अडकून आल्याचा आरोप केला.