आज रात्रीपासून औरंगाबाद शहरात 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल संचारबंदी


औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून कोरोना नियमांचे पालन राज्यातील जनता करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात याआधीलॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील 8 दिवसांत जनतेने घ्यायचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. आज रात्रीपासून शहरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत होणार असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.

हा निर्णय आज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तू, त्यासंबंधीचे उद्योग आणि अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयामधून सवलत देण्यात आली आहे. कर्फ्यूनंतर साप्ताहिक बाजार आणि दररोजचा भाजीपाला मार्केट चालू ठेवावे की नाही यासंबंधीचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. याआधी, सातारा, अमरावती, पुणे, वाशीम, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 132 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या आतापर्यंत 48,770 झाली आहे. यामध्ये 1,255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 941 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित केले. राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही, तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.