कळकळीची विनंती करतो, कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवार


मुंबई – राज्यावर कोरोना पाठोपाठ लॉकडाउनचे ढग गडद होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्याने लॉकडाउनसारखी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर पुढील आठ दिवसात लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्राला कळकळीचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन झाले. अजित पवार यांनी यावेळी बोलताना कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग राज्यात पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अजून सावध राहायला हवे. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.

आताचा कोरोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकत असल्याचे मुख्यमंत्र्यांना मी हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोना झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जात असल्याचे आपण पाहिले आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होत आहे. त्यामुळे कसे जगायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचे कोरोनाबद्दलचे गांभीर्य निघून गेले आहे. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने सांगायचे असल्याचे म्हणत अजित पवार यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.