मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही बंद राहणार शाळा, लग्नाचे हॉल


मुंबई – मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले असून रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जनतेशी संवाद साधताना परिस्थिती पाहून पुढील आठ दिवसांत लॉकडाउनसंबंधी निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण वाढणाऱ्या नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

नागपुरात लागू असलेले नवीन नियम –

  • कोरोना प्रतिबंधासाठी ७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवणार.
  • शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवणार.
  • ७ मार्चपर्यंत आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवणार.
  • ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत जिल्ह्यातील हॉटेल (रेस्तराँ) सुरु ठेवण्यास परवानगी.
  • ७ मार्चपर्यंत लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम बंद. पण मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद राहतील.
  • कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.
  • कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.

शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित

लॉकडाउन नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार असल्याचे नितीन राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नागपूर जिल्ह्य़ात आढळत असल्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

३० ते ४० वयोगटातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रुग्ण वाढण्याला मुखपट्टी न घालणे, शारीरिक अंतर न ठेवण्यासह बिनधास्त फिरणेच प्रमुख कारण असल्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील याआधी बाधित वाढत असलेल्या शहरात रात्रीच्या संचारबंदीचा विचार केला जात असून त्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली होती. विशेषत: औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू असून त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.