राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधलेल्या संवादातील महत्वाचे मुद्दे


मुंबईः राज्यावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत असून त्यांनी यावेळी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संपर्क साधताना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणे बंधनकारक
  • कोरोना सोबतचे युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल आहे. मास्क घालायला विसरलात तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणे बंधनकारक आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
  • आम्ही आंदोलन केले आणि एखादी गोष्ट उघडली. पण कोरोनाशी मुकाबला ते करू शकत नाही. उद्या कोरोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकत नसल्यामुळे शासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जात आहेत, त्याचे पालन आपण केले पाहिजे. पण आता राज्यातील नागरिकांनी मास्क वापरणे सोडले आहे. या लढाईत मास्क हीच आपली ढाल आहे. या लढाईत मास्क दिसत नसल्यामुळे मास्क घालणे बंधनकारक आहे. या पूर्वीच्या काळात बेड्स, ऑक्सिजन बेड्स नव्हते. त्यावेळी पोलीस, डॉक्टर देवदूतासारखे धावून आले.
  • तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये झाले होते. जेव्हा कोरोनाची लाट आली येते तेव्हाच तिला थांबवायचे असते. आपल्यासारखीच शिथिलता पाश्चिमात्य देशांमध्येही आणल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली. त्याच्यावर लॉकडाऊन हा उपाय आहे की नाही? मला माहिती नाही. पण संपर्कातून होणारा संसर्ग यातून थांबवता येऊ शकतो.
  • कोरोनाचा राक्षस आता पुन्हा डोके वर काढतो आहे. आपण थोडे फिरायला लागलो. लग्नावरची बंधने अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे आता कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. सूचनांचे पालन समजूतदारपणे करा. सगळ्यांना वाटले कोरोना गेला. पण कोरोनाची लाट खाली जाते आणि झटक्यात वर येते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचे काम असते. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे.
  • कोरोनावरचा संपर्काची साखळी तोडणे हाच उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावे लागणार आहे. घरचा विवाह सोहळा मंत्री नितीन राऊत यांनी रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव, असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
  • तुमच्या मुलाला जनतेच्या वतीने आशीर्वाद आहे. जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार आहे, मास्क वापरला नाही तर दंड आकारला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
  • मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर उद्यापासून बंदी घालण्यात आली आहे. पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
  • एकत्र मिळून आपल्याला लढायचे आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतो. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नको आहे ते मास्क घालून फिरतील, अंतर ठेवा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.