महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरू आहे : मुख्यमंत्री


किल्ले शिवनेरी : राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साह असून शिवजयंतीचा उत्साह शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर या विशेष कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हे माझे दुसरे वर्ष आहे. जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळे हा बहुमान लाभलेला आहे. कोरोनाबरोबर आता आपले युद्ध सुरु आहे. मास्क हीच या युद्धात आपली ढाल असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरू आहे. आपली यासाठी ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ करत आहेत, त्यांना ठेचून पुढे जायचे असते, असे ते म्हणाले. यावेळी आमदार अतुल बेनके म्हणाले की, डोळ्याने ओळखणारी भाषा अजितदादांना येते. ती भाषा आता मला शिकावी लागणार आहे. कारण दादाच्या मनातले मला ओळखता आले पाहिजे. अगदी गॉगल घातला तरी मी दादाच्या मनातले सगळे ओळखून दाखवणार, असे म्हणताच एकच हशा पिकला.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, जगभरात महाराष्ट्राचा इतिहास पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडाशी जोडले गेले पाहिजे. सी फोर्ट सर्किट टूरिझम म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून त्यांना जोडायला हवे. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. राज्यभरात महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. राज्यभर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.