कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रिसूत्रीचा वापर जनतेने करण्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच जनतेने मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

गेल्या महिन्याभरातील सर्वात जास्त कोरोना रुग्णवाढ झाली असून रुग्णसंख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल राज्यात ५ हजार ४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या महिन्याभरात ही संख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान मर्यादित होती.

काल २,५४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १९,८७,८०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५% एवढे झाले आहे. राज्यात आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. मात्र जनतेने योग्य खबरदारी घेऊन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने याबाबत सतर्क राहावे, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.