उपमुख्यमंत्र्यांनी दिले राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत


मुंबईः राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत १ फेब्रुवारीपासून लक्षणीय वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत माहिती देतानाच अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. इतर जिल्ह्यांत मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भान अधिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ दिसून येत आहे. अजित पवार यांनी त्यावर बोट ठेवत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून पुन्हा एकदा अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लावायचा विचार सुरु आहे. अमरावतीत मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या दिसत असून अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचे समोर आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन या तीन जिल्ह्यांत लावण्याचा विचार करत आहोत. सध्या अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत काय परिस्थिती आहे याबाबत अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी लॉकडाऊनबाबत माझे बोलणं झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

अमरावतीतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने ग्रासले आहे. मी त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. या तीन शहरांसाठी या बैठकीत काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत १ वाढ होत आहे, लोक मास्क लावत नाहीत. नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन लागू शकतो आणि निर्बंधही अधिक कठोर करण्यात येतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.