कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवार


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. डिसेंबरनंतर राज्यात रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 4 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले.

नव्याने कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा रविवारी 4092 वर पोहोचल्यामुळे ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली. परिणामी कोरोनाबाधितांच्या संख्येचा हाच वाढता आलेख पाहता नागरिकांनीही कठोर निर्णयाच्या तयारीत राहावे, असे संकेत अजित पवार यांनी दिले.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन यामध्ये चर्चेतून काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, नागरिकांनी त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी, असे पवारांनी नागरिकांना उद्देशून स्पष्टपणे सांगितले. वेळीच निर्णय काही गोष्टींच्या बाबतीत न घेतल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे म्हणत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीला मिळालेल्या गंभीर वळणाचे चित्र जनतेसमोर मांडले आहे.