कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे वाढ! लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील : आरोग्यमंत्री


औरंगाबाद : राज्यात दररोज 500 ते 600 ने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हे बाधित काही ठराविक ठिकाणीच वाढत आहेत. खासकरून विदर्भ, मुंबईत कोरोनाबाधिथांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे नियमांचे पालन करावेच लागेल. ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रीटमेंट करने पाळावे लागेल. केंद्रीय आरोग्य समितीच्या सूचना आम्ही पाळत असून, त्याचबरोबर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे अशा सूचना केल्या आहेत, त्याचीही अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरूं केला आहे. आजपासून दुसरा डोस दिल जात आहे. कॉविन अॅपमध्ये कुठलाही दोष नाही, मॅन्युअल पद्धतीने ज्यांनी एन्ट्री केल्या होत्या त्यांना त्याच पद्धतीने पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. यंत्रणेत दोष नसल्याचा खुलासा टोपे यांनी केला आहे.

आम्हाला 4500 कोटी रुपये हॉस्पिटल बांधकामसाठी लागणार असल्याची मागणी आम्ही अर्थसंकल्पात केली, त्यासाठी राज्य सरकारला एशियन बँक कर्ज देणार आहे, त्यातून आरोग्य विभागालाही मदत होईल. नियमानुसार आरोग्यावर जीडीपीच्या 5 टक्के खर्च व्हायला हवा, तो आतापर्यंत 1 टक्के होता, त्यामुळे परिस्थिती पाहता आम्हाला भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये जे अधिकारी लक्ष देत नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या कोरोनासंदर्भातील कोणतेच नियम पाळले जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण राज्यातील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. पण, कोरोना नियमावलीची सगळ्यांना पालन करावे लागेल, जर नियम पाळले नाही तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झाला आहे, त्यामुळे लॉकडाउन आपल्यालाही करावा लागेल. पण, हे टाळायचे असेल तर नियम पाळावेच लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, लोकल आताच सुरू केली, आपण लक्ष ठेवून आहोत, टोकाचा निर्णय घ्यायची वेळ अजून तरी आली नसल्याचे टोपे म्हणाले.