मागील २४ तासांत राज्यातील पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ, तर ३८ रुग्णांचा मृत्यू


मुंबई – शनिवारी देखील मागील २४ तासांमध्ये राज्यात आढळलेल्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. ३ हजार ६११ नवे कोरोनाबाधित राज्यभरात वाढले असून, १ हजार ७७३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हायरसमुळे ३८ रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६० हजार १८६ वर पोहचली आहे.

याशिवाय आतापर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ जण राज्यात कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) आता ९५.८३ टक्के झाले आहे. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३३ हजार २६९ असून, आजपर्यंत ५१ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने दिले आहे.

या आठवडय़ात राज्यात उतारणीला लागलेला कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्य़ात आठवडाभरात पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत राज्यात हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.