अजित पवार राज्यपालांवर पुन्हा एकदा संतापले


नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अद्यापही राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे यावरुन आता वाद पेटण्याची चिन्ह आहे. आता राज्यपालांना थेट न्यायालयात जाण्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित पवार आहेत. निधी वाटप आणि विकासकामांबद्दल यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माहिती दिली. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर जाहीर भाष्य केले. नियमानुसार 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी महाविकास आघाडी सरकारने तयार केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे ती यादी पाठवली आहे. पण महिने उलटले पण अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. लवकरच राज्यपाल नावे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला न्यायालयात जाऊ देणार नसल्याचे वाटत असल्याचे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.

तसंच, मुंबईतील लोकल सेवा सुरू झाली आहे. पण लोकलसाठी काही वेळा ठरवून दिल्या आहे. या वेळांबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे कानी आले आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या वेळा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो बदल केला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. त्यात केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा आणि आंदोलनावर तोडगा काढावा. शेतकऱ्यांचा कृषी कायदे रद्द करावी अशी मागणी करणे हा अधिकार आहे. पण बऱ्याच दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्यामुळे मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजुंनी 2 पावले मागे सरकावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.