अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान उडाली शाब्दिक चकमक


अमरावती – राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अमरावती विभागातील वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान निधीच्या मागणीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. अकोला जिल्ह्यासाठी थोडा निधी अजित पवार यांनी वाढवून दिल्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी मिळालेल्या निधीवरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींची या बैठकीत मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५, वाशिम १८५ तर अकोला साठी १८५ कोटीचा निधी देण्यात आला. पण अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या निधीवर नाराजी व्यक्त केली.

सरकारमध्ये मी असल्यामुळे काही बोलू शकत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून निघावा याकरिता आपण अधिक निधीची मागणी केली होती, पण निधी वाढून देण्यात आला नाही, पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

तरतुदीपेक्षा वाढीव निधी विभागातील पाचही जिल्ह्यांना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अकोला जिल्ह्यासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ती १८५ कोटी रुपये करण्यात आली आहे, याशिवाय अमरावतीची तरतूद २८५ वरून ३०० कोटी, यवतमाळसाठी ३१० वरून ३२५, बुलढाणा जिल्ह्यासाठी २८५ वरून २९५ तर वाशिम जिल्ह्यासाठी तरतूद १४० कोटी रुपयांवरून १८५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित (मागास) जिल्ह्यात मोडत असल्याने वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी मात्र निधीच्या वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे संकेत दिले.