मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताला संजय राऊतांचा दुजोरा


मुंबई – महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसने नाना पटोले यांच्या हाती दिली आहेत. त्याचबरोबर सहा कार्याध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. पण, प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्त करण्यात आल्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी विधानसभेचे अध्यक्षपद असलेल्या नाना पटोले यांची निवड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहेत का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना त्यावर भाष्य केले. नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असे आम्ही सामनात म्हटले आहे. अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असते. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने पुन्हा निवडणूक होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीन पक्षांचे बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात, असे राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला संजीवनी देण्याचा त्यांचा उत्साह महत्त्वाचा असून सत्तेमध्ये नसला तरी काँग्रेस महत्त्वाचा आहे. पक्षाची परंपरा इतिहास महत्त्वाचा आहे. काँग्रेसला संपूर्ण देशात संजीवनी मिळावी. काँग्रेस मजबूतीने उभी राहावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यात पक्षातंर्गत परिवर्तन केले असेल, तर तो त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. आम्हाला नाना प्रिय आहेत. नाना पटोले हे सक्षम आणि आक्रमक नेते आहेत. नानांनी महाराष्ट्रात काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम करावे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष वाढवू. पण, काँग्रेस देशात मजबूत व्हावी, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

राऊत यांना विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राऊत त्यावर बोलताना म्हणाले, ही गोष्ट शरद पवार यांनी म्हटली असल्यामुळे यावर पुन्हा चर्चा होईल. काँग्रेसला जेव्हा विधानसभेचे अध्यक्षपद दिले होते, ते पाच वर्षांसाठी दिले होते. तेव्हा कुणाला माहिती नव्हते की, विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होईल. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक का? याचाही विचार काँग्रेसने करायला हवा होता. पण, ठीक आहे. काँग्रेसने निर्णय घेतला आहे. तीन पक्ष बसून निर्णय घेतील.