आमचा अंत पाहू नका; आमदारांच्या नियुक्त्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा – राज्यपालांवर अजित पवार संतापले


पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांना आम्ही सर्व नियम आणि अटी पाहून 12 नावे दिलेली असल्यामुळे राज्यपालांनी आता अंत पाहू नये, असा संताप पवारांनी व्यक्त केला.

अजित पवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, राज्यपालांना आम्ही सर्व नियम आणि अटी पाळून 12 नावे दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करुन आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्रही राज्यपालांना देण्यात आले. पूर्ण बहुमत आमच्याकडे असून, सभागृहातही बहुमत सिद्ध झालेले असल्यामुळे या नावावर राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असे अजित पवार म्हणाले.

पुढे पवार म्हमाले की, ज्या गोष्टी राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी करायला हव्यात त्या सर्व करण्यात केल्या. एवढे सगळे झालेले असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी आणि तेच सही करत नसल्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावे लागेल. सही का करत नाहीत हे विचारावेच लागेल. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.