बळाचा वापर करुन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम : शरद पवार


मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय़ घेतला. परेड निघाली, पण शांततापूर्ण मार्गाचा कुठेही अवलंब केला गेला नाही. पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि शेतकऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री दिल्लीत पाहायला मिळाली. दगडफेक, धक्काबुक्की या रॅलीदरम्यान असेच एकंदर चित्र पाहायला मिळाले. आता देशभरातून शेतकरी परेडदरम्यान उसळलेल्या याच संघर्षावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर शेतकऱ्यांची बाजू मांडत केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. पण, आपण बळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी आपल्या ट्विटमधून केले. धुमसणारा पंजाब देशाने पाहिला आहे, आता पुन्हा तिच परिस्थिती उद्भवू देवू नका, असा इशाराच त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि ट्रॅक्टरचा सहभाग शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये असणार याची अपेक्षा असूनही चर्चा करून या गोष्टी वेळीच थांबवता आल्या असत्या. पण, तसे काहीही झाले नसल्याचे म्हणत केंद्रावर ताशेरे ओढत आपण दिल्लीतील घटनेचे समर्थन करत नसून सर्वांनीच या परिस्थिती मागच्या कारणांचा विचार करायला हवा ही बाब अधोरेखित केली.

जेव्हा देशातील बळीराजा एखादी मागणी करतो, तेव्हा त्याचा विचार केला गेलाच पाहिजे, असे म्हणत या परिस्थितीमध्ये केंद्राची नेमकी काय भूमिका असणे अपेक्षित होते, यावर शरद पवारांनी प्रकाशझोत टाकला. केंद्राने कृषी कायदे थेट मंजूर केले, तेव्हापासून या साऱ्याची प्रतिक्रिया उमटणार असे आपल्याला वाटलेच असल्याचे म्हणत पवारांनी दिल्लीतील हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत केंद्राच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.