माथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नका; शरद पवार आणि संजय राऊतांवर संतापले आशिष शेलार


मुंबई – प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून दिल्लीत करण्यात आलेल्या हिंसाचारावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार यांची जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट का पडली नाही? देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने रोज वचवच करणारे संजय राऊत का बोलले नाहीत? अशी संतप्त विचारणा मुंबईत पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी केली आहे.

एक चकार शब्द हिंसाचार करणाऱ्यांविरोधात काढला नाही. देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने रोज वचवच करणारे संजय राऊत का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा, जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. आता का तुमची तोंडे शिवली आहेत हा प्रश्न तुम्हाला देशवासियांच्या वतीने आम्ही विचारत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

२०१४ पासून २०२० पर्यंत केंद्र सरकारने जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचे समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी अराजकता आणू पाहत आहे. पण यांना देश सोडणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. गोळीबार विरोधकांना हवा होता का ? आंदोलन चिघळले होते का? त्यामुळे माथी भडकावण्याचे काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नसल्याचा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.