केंद्रातील मोदी सरकारला देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही – शरद पवार


मुंबई – दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. आता या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात आज(सोमवार) हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करताना ही लढाई सोपी नाही. कारण, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. आपण पाहत आहात, ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांची देशाच्या पंतप्रधानांनी कधी चौकशी केली का? असा प्रश्न केला आहे.

शरद पवार यांनी यावेळी, पंजाब व हरियणाचा आंदोलन करणारा शेतकरी हा असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झाले? पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? असा संतप्त सवाल देखील केला. तसेच, चर्चा न करता कायदा आणले गेले. जेव्हा कायदा संसदेत आणला तेव्हा एका दिवसात एका अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य झाले. कायदा आणताना सविस्तर चर्चा झाली पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.

तसेच, शेतकऱ्यांचे जीवन जो उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्यात आहे, हे आज या ठिकाणी तुम्ही दाखवून दिले आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अभिनंदन करतो. असे शरद पवार उपस्थित आंदोलक शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप, अबू आझमी यांच्यासह महाविकासआघाडी व शेतकरी संघटनांमधील अनेक नेत्यांची देखील यावेळी उपस्थिती होती.