सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवली – साक्षी महाराजांचा आरोप


उन्नाव – भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून, खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांनी भर सभेत केला आहे. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त उन्नाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वातारण तापायला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

साक्षी महाराज म्हणाले, सुभाषचंद्र बोस यांना अवेळीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले होते. माझा आरोप आहे की सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आले होते. कारण, पंडित नेहरू व महात्मा गांधी यांचा सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर कुठच टिकाव लागत नव्हता.


तसेच, सुभाषचंद्र बोस ते व्यक्तिमत्व होते ज्यांनी नारा दिला होता की, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा.. इंग्रज एवढे सरळ नव्हते की मागितल्यावर स्वातंत्र्य दिले असते. अनेक जण या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आहेत. रक्त सांडवून आपण स्वातंत्र्य मिळवल्याचे देखील साक्षी महाराज यांनी यावेळी बोलून दाखवले.

सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्य युद्धात महत्वाची भूमिका निभावली आहे. अद्यापही त्यांच्या मृत्यूबाबत गुढ का कायम आहे? पंडीत नेहरु यांनी चौकशी का केली नाही? त्यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर यायला हवे, असे देखील साक्षी महाराज म्हणाले.