जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही – शरद पवार


मुंबई – एका महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झाल्यानंतर राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाल्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर महिलेच्या तक्रारीची दखल गांभीर्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी देखील घेतली आहे. पण त्यानंतर हळूहळू या प्रकरणाबाबत एक एक खुलासे होत गेल्यानंतर आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी या प्रकरणावर भाष्य केले. या प्रकरणातील सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, राजीनाम्याचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी. प्रकरणाची चौकशी पोलीस विभाग करेल. आमचे हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी, अशी सूचना शरद पवार यांनी दिली. जेव्हा मी काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्रे माझ्या समोर नव्हते. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतल्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असे वाटत असल्याचे ते पुढे म्हणाले.

गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावे लागते, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भाजप नेते हेगडे आणि मनसे नेते धुरी ही एक दोन उदाहरण आली नसती तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणे आल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस तपास करतील. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावे लागेल, असे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवला.