अशा आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही – संजय राऊत


मुंबई – विरोधक सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. महाविकास आघाडीवर टीका करण्यासोबतच धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. त्याचबरोबर विरोधकांकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान आरोप करणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांची भेट घेण्यासाठी संजय राऊत सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतले पाहिजे की हे सरकार भक्कम असून सरकारचा एकही खिळा अशा आरोपांमुळे ढिला पडणार नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची विरोधक मागणी करत असल्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झाले तरी राजीनामा घ्या, असे ते म्हणतात. जर असे म्हणायला गेलो तर रोज पंतप्रधानांचा राजीनामा आम्ही मागू. जे आंदोलन दिल्लीत सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे, असा उल्लेख घटनेत नाही. कोणत्याही प्रकारचा धक्का महाविकास आघाडीला बसणार नाही. त्यांना आरोप करु देत त्यांच्याने काही होत नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.