धनंजय मुंडेंवरील कारवाई प्रकरणी शरद पवारांचे वक्तव्य


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच यावर पक्षप्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावले उचलली जातील, असे सांगितले आहे.

मला काल धनंजय मुंडे स्वत: भेटले. त्यांनी यावेळी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असे होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज असावा म्हणून त्यांनी आधीच उच्च न्यायालयात जाऊन आपले म्हणणे मांडले असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला असल्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्यावर झालेल्या त्या आरोपाचे स्वरुप गंभीर असून पक्ष म्हणून यासंबंधी विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. सखोल आणि सविस्तर माहिती मुंडे यांनी मला दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे. त्यांचे मत घेऊन पुढील पाऊले उचलली जातील. याला जास्त वेळ लागेल, असे मला वाटत नाही. मी न्यायालयातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, राजकारण होत आहे का यावर मी जास्त भाष्य करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य मी वाचले असून यामध्ये त्यांनी संयमाने जाण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. हे मत पक्षप्रमुखांचे असेल आणि इतरांचे दुसरे असेल तर अशा परिस्थितीचा फायदा विरोधकांकडून केला जात असून याबद्दल अधिक सांगायची गरज नाही.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे का? असे शरद पवारांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, मला आधी माझा निर्णय तर घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्री वैगेरे बघू. पुढील भूमिका काय असेल त्यासंबंधी निर्णय़ आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेऊ. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी वाट पाहण्याचे कारण नाही. पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.

राज्यातील सरकारमध्ये नवाब मलिक महत्वाचे मंत्री आहेत. त्यांच्यावर कोणताही व्यक्तीगत आरोप झालेला नाही. त्यांच्या नातेवाईकावरआरोप झाला आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणे आणि वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने तपास यंत्रणा काम करेल अशी अपेक्षा आहे. संबंधितांकडून त्यांना सहकार्य होईल याची खात्री आहे. नवाब मलिक गेली अनेक वर्ष राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच आरोप झाला नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.