या आठवड्यात होणार दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा


मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा या आठवड्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली. मे महिन्यात दहावीची परीक्षा तर १५ एप्रिलनंतर बारावीची परीक्षा आयोजित करण्यात टेणार असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले. तत्पूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे निवृत्त झाल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार दिनकर पाटील यांच्यावर सोपवण्यात आला आहे. या आठवड्यात आम्ही परीक्षांच्या तारखा जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल, असे पाटील म्हणाले. दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाटील म्हणाले, नुकतेच पुरवणी परीक्षांचे आयोजन मंडळाने केले होते. ही परीक्षा सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा सुरळीत पार पडली. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. याच पद्धतीने संपूर्ण सुरक्षा, खबरदारीसह नियमित परीक्षाही आम्ही आयोजित करू असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.